केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज मुंबईतील सायन (Sion) येथील नूतनीकरण केलेल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे (National Skill Training Institute) उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. या 60 वर्ष जुन्या प्रतिष्ठित संस्थेला आता नवीन इमारत मिळाली, हा खूप आनंदाचा क्षण आहे, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) जयंत चौधरी नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून कौशल्याविषयी उत्साहाने बोलले होते, परिणामी या क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे. आपल्याला कौशल्याला आकांक्षी बनवायचे आहे. 12 वी नंतर मूल पदवीऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन आयटीआय अभ्यासक्रम करू शकेल, असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. जर कोणी मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम शिकत असेल, तर तिला किंवा त्याला माहित असले पाहिजे की नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतर्वासिता किंवा उमेदवारीच्या 50% क्रेडिट्ससह 50% शैक्षणिक क्रेडिट्सची सुविधा देण्यात आली आहे. यासंदर्भात नवीन जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जयंत चौधरी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 1000 हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहेत ज्या देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या जवळपास 66% आहेत. ही आपल्या सर्वांसाठी मोठी जबाबदारी आहे आणि आपण या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुधारणा केली पाहिजे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात उद्योग खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्र्यांनी कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीमध्ये उद्योगाच्या भूमिकेवर बोलताना सांगितले. आमचे उद्योग भागीदार आज प्रशिक्षणार्थींना सामावून घेत आहेत आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्वा (CSR) द्वारे या क्षेत्रात पैसे गुंतवत आहेत. आपल्या उद्योगांना जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल, तर कामगारांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असंही ते म्हणाले. आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेल्या कॉर्पोरेट भागीदारांचे त्यांनी अभिनंदन केले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची आपली महत्त्वाकांक्षा आपण एकत्रितपणे वाटचाल केल्यास पूर्ण होऊ शकेल, असा विश्वासही यावेळी चौधरी यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात NSTI आणि MDL, BARC, DVET यांसारख्या संस्था आणि राज्याच्या विविध विभागांमध्ये कौशल्य विकासाबाबतच्या सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. हे करार कौशल्य-आधारित शिक्षणात NSTI मुंबईच्या नेतृत्वाला बळकटी देत असून विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम देण्यासाठी संस्थेची क्षमता विकसित करतील, ज्यायोगे ही संस्था या क्षेत्रात आघाडीवर राहील.कौशल्य विकास राज्यमंत्र्यांनी इतर मान्यवरांसह मोटर मेकॅनिक व्हेईकल सेक्शन आणि वेल्डर सेक्शन या नूतनीकरण केलेल्या वर्कशॉपचे उद्घाटन केले. यावेळी जयंत चौधरी आणि मंगल प्रभात लोढा यांनी TATA-IIS लॅबलाही भेट दिली आणि प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
नूतनीकरण केलेल्या पायाभूत सुविधा
अलिकडच्या वर्षांत, NSTI मुंबईने प्रशासकीय इमारती आणि विविध विभागांच्या नुतनीकरणाद्वारे पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. याव्यतिरिक्त, स्ट्राइव्ह (STRIVE) प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेल्या निधीतून नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली असून, त्यामुळे वेल्डर, मोटार मेकॅनिक व्हेईकल आणि टर्नर विभागांचा लक्षणीय विकास झाला आहे. या सुधारणांचे आज उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था
मुंबईतील नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NSTI), अर्थात राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण महासंचालनालयांतर्गत एक प्रमुख संस्था असून, उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणारी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रेसर संस्था आहे. पंतप्रधानांच्या स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया मिशनचा एक भाग म्हणून, NSTI मुंबई जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी आपल्या सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे.