‘हा’ खेळाडू ठरला टेस्ट टीमचा नवा कर्णधार,घ्या जाणून

लेखणी बुलंद टीम:

टीम इंडियाला पुढच्याच महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचं आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टेस्ट सीरीज होणार आहे. ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27ची पहिली टेस्ट सीरीज असणार आहे. या सीरीजच सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. या सीरीजद्वारे भारतीय क्रिकेटच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने टेस्टमधून संन्यास घेतला आहे. रोहित हा टेस्ट टीमचा कर्णधार होता. त्यामुळे नव्या कर्णधारासोबतच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या नव्या कर्णधाराचं नाव अखेर ठरलं आहे. बीसीसीआय लवकरच त्या नावाची घोषणा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाचा दौरा अत्यंत वाईट होता. या दौऱ्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर रोहितला टेस्ट टीममध्ये स्थान मिळणार नाही असं सांगितलं जदात होतं. या बातम्या सुरू असतानाच रोहितने अचानक टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. रोहितने संन्यास घेतल्यानंतर आता नवीन कर्णधार कोण? असा सवाल केला जात आहे. टेस्ट टीमच्या कर्णधारपदासाठी अनेक नावे रेसमध्ये आहेत. पण या सर्वात जसप्रीत बुमराहचं नाव सर्वात वर होतं. पण या रेसमध्ये आता बुमराह मागे पडलेला दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, युवा स्टार खेळाडू शुभमन गिलकडे टेस्ट टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तोच टेस्टचं नेतृत्व करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे.

त्याच दिवशी संघाची निवड

मीडिया रिपोर्टनुसार, 23 किंवा 24 मे रोजी टीम इंडियाचं सिलेक्शन केलं जाणार आहे. शुभमन गिल याच्याकडेच इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व देणार असल्याचं ठरलं आहे. टीमची निवड करण्यात आल्यानंतर त्याच दिवशी बीसीसीआय नवीन संघ जाहीर करतानाच टेस्टचा कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी बीसीसीआय पत्रकार परिषद घेऊन ही घोषणार करणार असल्याची शक्यताही आहे. रिपोर्टनुसार, टेस्ट क्रिकेटचा रोडमॅप ठरवण्यासााठी शुभमनने हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्याशी चर्चाही केल्याचं सांगितलं जातं.

पहिल्यांदाच नेतृत्व

रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व स्वीकारण्याची शुभमनची ही पहिलीच वेळ असणार आहे. यापूर्वी टी20 फॉरमॅटमध्ये त्याने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. गेल्यावर्षी झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर तो टीमचा कर्णधार बनला होता. त्यावेळी 5 टी 20 खेळले गेले होते. त्याशिवाय तो आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2025मधील कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळेच त्याला टेस्ट टीमचं कर्णधार पद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी बीसीसीआयचा फायनल निर्णय काय असेल हे 23 किंवा 24 मे रोजीच समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *