‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याच्या मार्गावर (Maharashtra State Lottery to be Closed)आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले जाणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी (Maharashtra State Lottery) विक्रेता संघटनेने हा विचाराधीन असलेला बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाला (Maharashtra Govtrenment) केली आहे.
महाराष्ट्र शासनाने 1969 साली ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ सुरू केली होती. अनेकांच्या हातून कामे जाणार, तरूण बेरोजगार होणार अशा संकटाना पाहता संघटना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात संघटनेकडून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईतील पत्रकार परिषदेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिली आहे.
सरकारने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, विक्रेते एकत्रितपणे सहकारी तत्वावर ही लॉटरी चालविण्यास तयार आहेत, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने घेतली आहे. मात्र, राज्य शासनाने लॉटरी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन लॉटरी प्रक्रिया सुरू राहण्यासाठी एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि यासंबंधित सर्व घटकांना चर्चेसाठी निमंत्रित करावे. शासकीय लॉटरी म्हणून लॉटरीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.