महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

MAHATET Nov 2024 exam Result:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पेपर । (इ. १ ली ते ५ वी) पेपर II (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे अकाउंट लॉग इन करून निकाल पाहता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात १० तारखेला ही परीक्षा झाली होती. साडे तीन महिन्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पेपर । व पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल आज (३१ जानेवारी २०२५) रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक १ फेब्रुवारी २०२५ ते ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहे. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.

राखीव निकालांचे काय ?
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेलवर पाठवावे. ६ फेब्रुवारीनंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १० नोव्हेंबरला (रविवारी) राज्यभरात विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. नोंदणी केलेल्या ३ लाख ५३ हजार ९५२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २९ हजार ३४६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ‘फेस रीडर बायोमेट्रिक प्रणाली’द्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी तासभर आधी विद्यार्थ्यांना बोलावूनही काही केंद्रावर प्रशासनाची धांदल उडाली होती. परीक्षा कक्षात काहींची उपस्थिती फेस रीडर बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ घेण्यात आली होती. तीन वर्षानंतर झालेली ही परीक्षा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची होती. त्यामुळे डीएड, बीएडधारकांचे या परीक्षेकडे लक्ष होते. मागील परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेत परिषदेने परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल केले होते. सीसीटीव्ही कॅमेरा, नियंत्रण कक्षाच्या नियंत्रणात परीक्षा झाली होती. त्यासह उपस्थिती नोंदविण्यासाठी प्रथमच फेस रीडर बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात आला होता. सकाळी १०.३० च्या पेपरसाठी आठ, साडे आठपासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. दुपारीही दीड तास आधीच विद्यार्थ्यांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. विद्यार्थी संख्या मोठी असल्याने फेस रीडर बायोमेट्रिक प्रणालीत उपस्थिती नोंदविण्यास काहीसा उशीर होत होता. पहिल्यांदाच प्रणाली राबविण्यात येत असल्याने काही केंद्रावर काहीसी धांदल उडाली तर अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरळीत झाली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *