बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. रणजीत कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले असल्याची माहिती ही समोर आली आहे.

रणजित कासले विरोधात बीडमध्ये दोन गुन्हे दाखल
वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले याच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मिडीयातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली आहे. या दोन्ही तक्रारींवरुन बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

जामीन मिळाल्यानंतरही आरोप सत्र सुरूच
दरम्यान, रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासले समोरील अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरूच ठेवले होते. अशातच शनिवारी (25 मे) रणजित कासले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओत त्याने म्हटले होते की, कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो, तसेच त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते. इतकंच नाही, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर कराडला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *