मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर पडली आहे. दादर (Dadar News) कबूतरखाना परिसरात मुंबई महापालिकेचे (BMC) पथक तोडक कारवाईसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दाखल झाले. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावाने विरोध केल्यानंतर पालिकेने कबुतरखाना तोडला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आहेत. आता याठिकाणी कबुतरांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेला केवळ एक पिंजरा बाकी आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या सगळ्या गोष्टी हटवून कबुतरखान्यावर कधी तोडक कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. परंतु, काल पालिकेचे पथक याठिकाणी कारवाईला आल्यानंतर स्थानिक नागरिकांपैकी काहींनी या कारवाईला विरोध केला.
ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र, अनेक रहिवाशांनी नंतर तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या जागेला कबुतरखान्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. येथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढल्याने घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला होता. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे मनसेने या कबुतरखान्याच्या विरोधात आवाज उठवला होता. मनसेकडून 2017 पासून हा कबुतरखाना हटवण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे.