सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Rajkot Fort Collapse) धक्कादायकरित्या कोसळला. पुतळा कोसळल्यावरुन महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे.
महाविकासआघाडी तर्फे राजधानी मुंबईमध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा आज केली. महाविकासआघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकारपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस (SS) पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळ म्हटले की, येत्या 1 सप्टेबरपासून मुंबई येथील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विरोधी पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
इंजिन वाढली, भ्रष्टाचारही वाढला
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला अनेक इंजिन लावली. पण जितकी इंजिन जोडली गेली तेवढा भ्रष्टाचारही वाढतो आहे. या भ्रष्टाचार आणि अत्याचारी सरकारला जनताच धडा शिकवेल. महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी विरोधकांनी निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. तर हे शिवद्रोही लोक तिथेही आडवे आले, आता जनताच या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल असे ठाकरे म्हणाले.
राजकोट किल्ला परिसरात राडा
राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. हा वाद, संताप सुरु असतानाच विरोधक या प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप सत्ताधारी महायुती सरकारने केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना या विषयाचे राजकारण करायचे नाही, असे म्हणने म्हणजे बालबुद्धी असल्याचे प्रत्युत्तर मविआने दिले आहे. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. पुतळा पडलेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेत आज राजकोट किल्ल्यावर पोहोचले. या वेळी भाजपचेही नेते आणि कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला.