मिरा रोड ( प्रतिनिधी) : मिरा भाईंदर मध्ये कार्यरत असलेल्या सद्भावना मंचच्या वतीने मानव अधिकार दिनानिमित्त एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत राम पूनियानी यांनी मानव अधिकार, उगम व विकास याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सुरुवातीलाच त्यांच्या “आरएसएस भाजपा : विचारधारा व राजनीती” या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. कलीम जिया, प्रा. उत्तम भगत, कवी जुलमीरामसिंग यादव यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पूनियानी यांनी सम्राट अशोक, बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान, छ. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा संदर्भ देत या राजांनी धर्म रक्षणासाठी नव्हे तर रयतेच्या रक्षणासाठी कार्य केल्याचे प्रतिपादन केले. . परंतु, दुर्दैवाने आपल्या देशात हिंदू – मुसलमान असा वाद उभा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देश एकसंध राहील अशी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही मानवी मूल्ये बहाल करणारी राज्यघटना बहाल केली. या राज्यघटनेचे रक्षण करणे आजच्या काळात अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन राम पुनियानी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जुलमी रामसिंग यादव यांनी “उनकी देश भक्ती” ही सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सद्भावना मंचचे समन्वयक साजिद शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन सद्भावना मंचच्या ॲड. अलका यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. सुनिल धापसे, ॲड. शाहूद अन्वर, सय्यद बरकत अली यांच्यासह मीरा-भाईंदर परिसरातील प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.