वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाने काँक्रिटिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र करण्यात येत असलेले काँक्रिटिकरणाचे काम अतिशय निकृष्ट व नियोजन शून्य पद्धतीने केले जात असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात यासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम व रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी सकाळी महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. वसई फाटा ते चिंचोटीपर्यंत सुमारे एक हजार नागरिक या मानवी साखळीत सहभागी झाले होते.
सातत्याने तक्रारी करून व महामार्ग प्राधिकरण जागे होत नसल्याने वसईतील एन एच ४८ ॲक्शन काउन्सिल या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. वसई फाटा ते चिंचोटीपर्यंत हजारो नागरिक मानवी साखळी करून हातात महामार्ग प्राधिकरणाचा निषेध व मागण्या फलक घेऊन उभे होते. महामार्गावरील काम पहाता त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिक यासह वसई विरारच्या औद्योगिक क्षेत्रालाही बसत आहे. याशिवाय अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
महामार्ग प्राधिकरणाने वसई विरार कार्यक्षेत्रात जे काँक्रिटिकरणाचे काम केले आहे ते खूप निकृष्ट दर्जाचे आहे. जर असे काम असेल तर रस्ते टिकणार तरी कसे असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्डे व काँक्रिटिकरणाचे काम प्राधिकरणाने योग्यरित्या करावे अशी आमची मागणी असल्याचे संगितले .