राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. काही भागात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासांत मुंबई शहर व उपनगरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या दमदार सरीमुळे ठाण्यासह अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम उपनगरात (Mumbai Rain) जे सखल भाग आहे त्या ठिकाणी देखील आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अशातच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरला आहे. त्यासोबत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर देखील सखल भागात पाणी भरलं आहे. एकूणच या पावसामुळे सकाळी कामानिमित्य बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
तब्बल 20 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाची हजेरी
तब्बल 20 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन पाऊस गायब झाला होता. अधून मधून हलका पाऊस झाला होता. मात्र पाऊस नसल्याने कोवळ्या पिकांना धोका निर्माण झाला होता. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळं पिकांना जीवदान मिळाले आहे. तब्बल तासभर पाऊस सूरु होता. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असुन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय हवामान खात्याने देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकरी चिंतेत
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. नुकतेच पेरणी केलेली व उगवलेली पिके सुकू लागली आहेत. अशातच सोयाबीन पिकावर हुमनी अळीने आक्रमण केल्याने सोयाबीन पीकही धोक्यात आलं आहे. त्यामुळं जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकरी सोयाबीन पिकांवर रोटावेटोर फिरवून पीक नष्ट करत आहे. यामुळं मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा भार पडत आहे.