काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका रुग्णालयात एका महिला डॉक्टरावर पाशवी अत्याचार करण्यात आले. या घटनेत आरोपीने पीडित डॉक्टराची अतिशय अमानवीय पद्धतीने हत्या केली. त्यापेक्षा जास्त भयानक हे होतं की, रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीला पीडिताने आत्महत्या केल्याचा दावा केला. यानंतर विद्यार्थी, रुग्णालयाचा स्टाफ रस्त्यावर आला तेव्हा हे प्रकरण उजेडात आलं. या घटनेमुळे अख्खा देश हादरला आहे. या घटनेचा मानसिक परिणाम देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मनावरही खोलवर पडला आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती असल्या तरीही राष्ट्रपतीपदाच्या पलिकडे त्यांच्यात एक माणूस आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाताच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. कोलकाता सारख्या घटना आता बस्स झाल्या. मी निराश आणि भयभीत आहे, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. या घटनेमुळे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील सुन्न झाल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नेमकं काय म्हणाल्या?
“बस आता खूप झालं. मी पण निराश आणि भयभीत आहे. मुलींच्या बाबत गुन्हे घडत आहेत ते आता सहन होणारे नाहीत. आतापर्यंत जे झालं ते भरपूर झालं. समाजाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे आणि नि:पक्षपणे आत्मचिंतन गरजेचं आहे”, अशी भूमिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडली.
विशेष म्हणजे महिला अत्याचाराच्या घटनेवर पहिल्यांदाच असं बघायला मिळत आहे की, देशाच्या राष्ट्रपतींनी प्रतिक्रिया दिली आहे. “सभ्य समाज कधीच महिला आणि मुलींवर अत्याचार सहन करु शकत नाही. या घटनेनंतर कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तर आरोपी कुठेतरी बाहेर फिरत होते. आता बास्स झालं. समाजाला प्रमाणिक होण्याची आणि आत्मनिरीक्षण करण्याची खूप आवश्यकता आहे”, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.