महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानासाठी यंदा बीएमसी (BMC) कडून देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर दिवशी मतदान होणार असल्याने शहरी भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ही सुट्टी जाहीर झाली आहे. 20 नोव्हेंबर दिवशी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीच्या स्वरुपात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं सांगण्यात आले आहे. उलट आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
बीएमसीने निवेदन जारी करत “सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन, उपक्रम, औद्योगिक गट, व्यापार इतर सर्व आस्थापने यांनी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी रजा देणे बंधनकारक आहे.”
आपत्कालीन सेवेतील कामगारांना किंवा अपवादात्मक परिस्थितीत जिथे पूर्ण दिवसाची रजा शक्य नाही अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी त्यांना किमान चार तासांची सूट दिली पाहिजे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असेही बीएमसी ने म्हटलं आहे.
भारताच्या निवडणूक आयोगाने शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. ठराविक कालावधीत या भागात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत.