मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मिळणार मोठी जबाबदारी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आजपासून (7 डिसेंबर) विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. प्रोटेम स्पीकर नवनिर्वाचित 288 आमदारांना शपथ देत आहेत. विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून त्यादरम्यान नवीन सभापतींची निवडही होणार आहे. हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवीन आमदारांना शपथ देत आहे. नूतन सभापतींची निवड 9 डिसेंबरला होणार आहे. यानंतर महायुती सरकारसाठी सभागृहात विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर राज्यपाल विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळणार, याबाबतची स्थिती स्पष्ट नाही. मंत्रिमंडळावरून सुरू असलेल्या गदारोळात, 11-12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असताना आज महायुतीची बैठक होऊ शकते.

विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता
दरम्यान, विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसे यांनी या पद्धतीने निवड होऊ शकते, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची बैठक होऊ शकते
दुसरीकडे, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची मोठी बैठक होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कॅबिनेट खात्यांबाबत चर्चा होणार आहे. यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखात्याची मागणी केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला असून, विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे.

भरत गोगावले यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 11 ते 16 डिसेंबर दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नागपुरात 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, एबीपी न्यूजच्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले गेले होते की पोर्टफोलिओबाबत वाद झाला आहे का? त्यावर ते म्हणाले की, पोर्टफोलिओबाबत चर्चा सुरू आहे, मात्र कोणताही वाद नाही. तिन्ही पक्षांना योग्य तो मान देण्यात आला आहे. गृहखाते आपल्याकडेच राहणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले.

‘शिवसेना नेते म्हणाले, गृहमंत्रालयाची मागणी केली आहे’
एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय हवे असून भाजप त्यांना गृहमंत्रालय देण्यास तयार नाही, अशी चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या पुन्हा पुन्हा चर्चेत आहेत. शिंदे यांचे नेतेही उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, गृहमंत्रालयाकडे मागणी केली आहे, निर्णय तिघांनी घ्यायचा आहे, बघू काय होते ते. अजित पवारांचा पक्ष युतीत आल्याने आपल्या पक्षाचे नुकसान झाले आहे, यापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या असत्या, असेही ते म्हणाले. यानंतर अजित पवार गटाकडून जोरदार पलटावार अमोल मिटकरी यांनी केला. गुलाबराव जुलाबराव होऊ नका, असा टोला मिटकरी यांनी लगावला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *