रविवार पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरला. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला (Pune Kundmala Bridge Collapses) आणि या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांत एका मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यावेळी पुलावर 100 हून अधिक पर्यटक अल्याची माहिती आहे.
सुट्टीचा दिवस असल्याने इंद्रायणी नदीवरचा प्रसिद्ध कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. पण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीवरचा हा कमकुवत पूल कोसळला आणि एकच हाहाकार उडाला.
मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता. तसा बोर्डही साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लावण्यात आला होता. पण याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभिर्यानं पाहिलं ना प्रशासनानं काळजी घेतली. अखेर ज्याची भीती होती तेच रविवारी झालं. पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफच्या तुकड्या आणि इतर बचावपथकं दाखल झाली आणि तातडीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं. दुर्दैवानं या दुर्घटनेत काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.
दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गिरीश महाजनांनी गर्दीमुळेच हा पूल कोसळल्याचं म्हटलं. पण महत्वाची बाब ही की पूल जीर्ण झालेला असताना इथल्या प्रशासनानं इथून नागरिकांना ये-जा करण्याची परवानगी का दिली?
या पूल दुर्घटनेत काही जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अंधार पडल्यानंतर बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र तरीही वाहून गेलेल्यांचा शोध सुरू होता. हा पूल जुना झाला हे माहीत असूनही, तशा सूचनाही देऊनही पुलाचा सुरू असलेला वापर… हा झाला नागरिकांचा निष्काळजीपणा. पण पर्यटनस्थळ असलेल्या या गर्दीच्या ठिकाणी लक्ष न देणं, धोकादायक जुन्या पुलाची डागडुजी किंवा नवा पूल न उभारणं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नाही का?