राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यावर ही हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

लेखणी बुलंद टीम:

वैष्णवीच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरच्या महिलांचा छळ करतो की काय असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यासाठी थार गाडी दिलेल्या चौंधे कुटुंबाचा प्रतापही समोर आला आहे. या कुटुंबातील सूनेने 20 लाखांच्या हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार जानेवारी महिन्यात खडकी पोलिसात केली होती. तर फेब्रुवारी महिन्यात तिने राज्य महिला आयोगामध्ये तशी तक्रार दिली होती. पण नेहमीप्रमाणे महिला आयोगाने त्याकडे तक्रार केल्याचा आरोप तिने केला आहे.

वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपल्याला मारलं जातंय, आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला जातोय अशी तक्रार सुयश चौंधे याच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सूनेने त्रासाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा फरार असताना ज्या थार गाडीतून ते फिरत होते ती थार गाडी संकेत चौंधे याच्या नावावर आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

चौंधे कुटुंबातील सूनेने त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते असा आरोप सूनेने केला आहे. लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिलं. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो असं सूनेने म्हटलं आहे.

नवरा सुयश चौंधे हा ब्ल्यू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा. तर नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे असं त्या सूनेने म्हटलंय. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी त्या सूनेने केली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात टिकेची झोड उडालेल्या राज्य महिला आयोगाने या प्रकरणातही निष्क्रियता दाखवल्याचं समोर आलं आहे. चौंधे कुटुंबाकडून आपल्याला मारहाण केली जाते, हुंड्यासाठी छळ केला जातो अशी तक्रार जानेवारी महिन्यामध्ये खकडी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य महिला आयोगामध्ये त्याची तक्रार करण्यात आली होती. पण त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं सूनेने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *