मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस तर ‘या’ शहरांना ऑरेंज अलर्ट

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबई (Mumbai Rain) आणि कोकणासह (Konkan Rain) राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यताही आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. रात्रभर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात 23 मे पर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, ते पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे कोकणात पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता-
महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

सरासरीपेक्षा 7 ते 17 टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस असल्याचा अंदाज-
सरासरीपेक्षा 7 ते 17 टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच पावसाच्या दोन खंडांमधील अंदाज हा जास्त नसेल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियांचा आणि खतांचा पुरवठा केला जाईल. त्याचा तुटवडा पडणार नाही. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता कुठलं पीक उपयोगी पडेल याचा विचार केला जाणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *