वेळेवर ॲम्बुलन्स न मिळाल्याने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) रुग्णालयात पाच तास ॲम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार 35 वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या बाई रुख्मिनी बाई रुग्णालयात (Hospital) सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली. मात्र, रुग्णाला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स नसल्याने पाच तास रुग्णालयात ऍम्ब्युलन्सची वाट पाहावी लागली, यादरम्यान सविता यांचा मृत्यू झाला.

सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याने जबाबदार असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिनीचे रुग्णालयकडून चार्जेस आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मयत सविता बिराजदार यांच्या नातेवाईकांकडे 1000 रुपये नसल्याने त्यांनी ॲम्बुलन्स नाकारली, डॉक्टरांनी मयत सविता यांच्या नातेवाईकांना सल्ला दिला 108 ॲम्बुलन्सला कॉल करा. त्यानंतर, नातेवाईकांनी 108 ॲम्बुलन्सला कॉल केला, मात्र ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्याबाहेर 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स उभी आहे, त्या ॲम्बुलन्समध्ये ड्रायव्हर, डॉक्टर उपलब्ध नाहीत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे एकूण 4 ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत. मात्र, चालक उपलब्ध नसल्याने ॲम्बुलन्स रुग्णालयाबाहेर उभ्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दोन-तीन पेशंट आले तर जाऊ असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ॲम्बुलन्समध्ये ठेवण्यात आलेल्या सविता यांची प्रकृती खालवली, पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. जोपर्यंत रुक्मिणीबाई रुग्णालयातील जबाबदार रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे. सविता बिराजदार यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्या घरातल्या कर्त्या असल्याने घरातील मुलगा आणि मुलगी अनाथ झाल्याने कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

दोन महिन्यात तीन महिलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयामध्ये एका 30 वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाला. शांतीदेवी मौर्या ही महिला किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्यासाठी शक्तीधाम रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. यानंतर शांतीदेवी मौर्या यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. तर दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती .या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली होती या समितीने डॉ संगीता पाटील ,डॉ मीनाक्षी केंद्रे यांनी रुग्णाच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महापालिकेने या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले होते

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या पत्नी श्रुती गणपत कोनाळे एमडी पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी या पदावर अवघ्या 48 तासात नियमांना डावलून भरती केल्याचा प्रकार ‘एबीपी माझा’ने उघडकीस आणला होता डोंबिवलीतील शास्त्री रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे महिलांचे मृत्यू थांबण्यासाठी भरती केल्याचे वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी सांगितले होते. मात्र महिलांचे मृत्यू थांबण्याचे नाव घेत नसल्याने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली पालिकेचा सावळा गोंधळ उघड झाला असून पालिकेचा आरोग्य सेवा सक्षम करण्याचा दावा दोन महिन्यात पुन्हा फोल ठरला आहे

कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेत रुग्णाच्या नातेवाईकांसह डॉक्टरांशी चर्चा करून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 48 तासाच्या आत कारवाई करून जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती, उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *