जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या मृत पर्यटकांची नावे आहेत. तर दोन पर्यटक जखमी असून एकजण पनवेलचे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणिअतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जमखी आहेत. जखमींमध्ये माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. तर एस भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे.

जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुण्यातील पर्यटकांवर गोळीबार
पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालू न फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले.

या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सांगितलं की, पुण्यातील दोन कुटुंबीय पहलगामला गेले होते. हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.

पुण्याहून पहलगामला गेलेले पर्यटक

असावरी जगदाळे – महाराष्ट्र
प्रगती जगदाळे – महाराष्ट्र
संतोष जगदाळे – महाराष्ट्
कौस्तुभ गाबोटे – महाराष्ट्र
संगीता गाबोटे – पुणे

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *