‘आंबेडकरी साहित्य म्हणणे अधिक सार्थ आहे’-अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांचे स्पष्ट प्रतिपादन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नागपूर (प्रतिनिधी) :डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ४५ वर्षे बहिष्कृत समाजाच्या  उद्धारासाठी आयुष्य वेचले . मूकनायकसारखी नियतकालिके , ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी समाजाला नवे भान दिले. गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली . गुलामांची मने मनगटे मुक्त झाली. मुक समाज  आपल्या व्यथा बोलू लिहू लागला. यातून  नव्या संस्कृतीचा , नव्या साहित्याचा उदय झाला.   या साहित्य प्रवाहाची प्रेरणा बाबासाहेबांचे विचार कार्य होते. त्यामुळे या प्रवाहाला आंबेडकरी साहित्य म्हणणे अधिक सार्थ आहे, असे परखड मत प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांनी मांडले.

नागपूर येथे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई यांच्या वतीने आयोजित १६  व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. एम. एल. परिहार यांच्या हस्ते झाले. कामठी रोड येथे सुगत बुद्ध विहार सभागृहात संपन्न झालेल्या या संमेलनाप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. परमानंद बागडे, ॲड. आनंद गायकवाड, अरविंद निकोसे, अमृत बनसोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटक डॉ. एम. एल. परीहार यांनी साहित्यिकांना केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपले विचार पोहोचवण्याच्या दृष्टीने लिहावे, असे आवाहन केले. ॲड. आनंद गायकवाड,  अमृत बनसोड यांनीही  यावेळी मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना डॉ. मोगले म्हणाले,  बुटकी माणसे खूर्चिवर बसली की त्या खूर्चिची आब घालवतात. आंबेडकरी साहित्यिकांनी आपले मित्रही पारखून  घेतले पाहिजेत. पुरोगामी, डावे, विद्रोही म.फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची नावे आयुष्यभर घेतात. हिंदू धर्माची कठोर चिकित्सा करतात.  विद्रोहाची भाषा करतात. पण  सांस्कृतीकदृष्ट्या ते मरेपर्यंत  हिंदूच राहतात. हिंदू म्हणूनच मरतात. ते ना सार्वजनिक सत्यधर्म स्विकारतात ना बुद्धधम्माकडे वळतात. यांचं हे पुरोगामित्व ही नीट तपासून घेतलं पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन  प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांनी केले.

            यावेळी सूरेश वंजारी, अहील्याताई रंगारी व सूर्यकांत मुनघाटे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश वंजारी यांनी केले. संमेलनाची भूमिका प्रा. सीमा मेश्राम यांनी विषद केली. २१ मार्च रोजी संध्याकाळी संविधान मार्च काढण्यात आला. २२ मार्च रोजी उद्घाटन सत्रानंतर आम्ही सावित्रीच्या मुली हे लोक नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर प्रा. एन. व्ही. ठोके यांच्या अध्यक्षतेत “संविधान: मानवी हक्क अधिकाराचे मुख्य शस्त्र आहे ‘ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला तर सूर्यकांत मुनघाटे यांच्या अध्यक्षतेत गजल मुशायरा रंगला. सायंकाळी गटार या नाट्य प्रस्तुतीनंतर रात्री सुदाम सोनुले यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन रंगले. २३ मार्च रोजी स्त्रियांच्या चळवळीतील ध्रुवीकरणाचे प्रभाव आणि परिणाम  तथा स्त्रीवादी चळवळी आज मंदावल्या आहेत का? या विषयावर विद्या भोरजारे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद संपन्न झाला तर प्रा. डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेत ” आंबेडकरी प्रेरणेच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, साहित्यीक आणि राजकीय चळवळीचे परिशीलन या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. प्रा. डॉ. गजानन बनसोड यांच्या अध्यक्षतेत कथाकथन सत्र संपन्न झाले. ज्येष्ठ कवयित्री सुरेखा भगत यांच्या अध्यक्षतेत दुसरे कवी संमेलन संपन्न झाले तर दै. बहुजन सौरभच्या संपादक संध्याताई राजूरकर यांच्या अध्यक्षतेत विषम कालावकाषात आंबेडकरी साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. सम्मेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश मोगले व उद्घाटक डॉ . एम एल पारिहार यांच्या उपस्थितीत आंबेडकरी साहित्य आणि चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. सूर्यकांत मुनघाटे यांनी संमेलनातील ठरवांचे वाचन केले तर समारोपीय आभार प्रदर्शन जगदीश राऊत यांनी मानले. संमेलनाला नागपूर व परिसरातील आंबेडकरी चळवळीतील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *