जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहेत.वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे.मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
तडीपारीची कारवाई ज्या आरोपींवर करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे.चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही…पाहुण्यांचा तर विषय संपला, असं मनोज जरांगे म्हणाले.