मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजितदादांनी दिली महत्वाची अपडेट

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचार सुरू झाला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या लाडकी बहीण ही योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली आहे, ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, विरोधकांकडून दिशाभूल सुरू असल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, ते सांगवीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

या योजनेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी आम्ही पुढचे पाच वर्ष तरतुद केलेली आहे. ही योजना सुरूच राहणार आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी तीस लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येते, तेव्हा ती मनी ऑर्डर घेऊन पोस्टमन येतो. त्यालाही अपेक्षा असते की आता यांना पैसे मिळाले आहेत, ते आपण दिले म्हणून आपल्यालाही बक्षीस मिळेल. ज्याने मनी ऑर्डर घेतली त्याला त्या पोस्टमनला काही तरी बक्षीस द्याव लागायचं. मात्र आपण या योजनेत कोणी मध्यस्थ ठेवलाच नाही. आपण थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहोत. या योजनेसाठी पुढील पाच वर्ष तरतुद केली आहे. योजना पुढे चालू ठेवायची असेल तर घड्याळाला मतदान करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान पुढे ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर आपला मागचा अर्थसंकल्प हा साडेसहा लाख कोटींचा होता, पुढचा अर्थसंकल्प हा सात लाख कोटींचा असेल त्यातील 45 हजार कोटी रुपये हे लाडक्या बहिणींसाठी असतील तर पंधरा हजार कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्यासाठी असतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *