बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे गळती दूर करण्यासाठी आणि सामान्य पुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी सतत प्रयत्न करूनही या भागात समस्या कायम आहेत. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा कमी दाब जाणवत असून दूषित पाण्याची चिंता कायम आहे.तथापी, एच-पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणी पाणीटंचाईच्या तक्रारी कायम आहेत. पिण्याच्या पाण्याची सध्या सुरू असलेली टंचाईचा मुंबईकरांवर दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्याचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, खारदांडा येथील रहिवासी अनिता शर्मा यांनी सांगितले की, ‘आम्हाला संध्याकाळी 5.45 ते 6.45 दरम्यान, दूषित आणि फेस असलेल्या पाण्याचा तुटपुंजा पुरवठा होतो. हे पाणी आम्ही कपडे धुण्यासाठी देखील वापरू शकत नाही. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आम्हाला पाणी मिळते, जे स्वच्छ असते, पण ते 10 मिनिटांसाठी क्वचितच येते.’
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील शिवसेना नेते, चिंतामणी निवाते यांनी सांगितलं की, पाली हिल आणि चायना गेट येथील गळती दुरुस्त करण्यात आल्याचे बीएमसीने सांगितलं आहे. मात्र, अद्याप एका ठिकाणी काम बाकी आहे. एच-वेस्ट वॉर्डला 115 एमएलडी पाणी वाटप केले जाते. परंतु, प्रभागात फक्त 105, 103 तर कधी 100 एमएलडी पाणी मिळत असल्याचं निवाते यांनी सांगितलं.