लाखनी तालुक्यातील मासलमेटा-लाखोरी जंक्शनवर शुक्रवारी सकाळी महिला कामगारांनी भरलेल्या एका मिनी मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. किन्ही/एकोडीहून शाहपूर जवाहरनगर येथे वृक्षारोपणाच्या कामासाठी जात असलेल्या या वाहनाचे रस्त्यावर आलेल्या एका मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना अचानक नियंत्रण सुटले आणि ते झाडाला धडकले. या अपघातात सायत्रा नेवारे (वय 50, रा. किन्ही) या महिलेचा मृत्यू झाला, तर 21 महिला कामगार जखमी झाल्या.
या अपघातात आठ महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींमध्ये छत्रपती बोरकर (40), ज्योत्स्ना सोनवणे (36), वंदना सोनवणे (34), प्रमिला शेंडे (40), रत्नमाला बोरकर (35), वैशाली सोनवणे (37), रामकला नेवारे (30) आणि प्रमिला गेडाम (42) यांचा समावेश आहे. उर्वरित पाच जखमी महिलांवर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यावर मुलाला वाचवण्यासाठी चालकाने तातडीने निर्णय घेतला, परंतु वाहनाचे नियंत्रण सुटले आणिअपघात घडला . अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत केली. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना भंडारा येथे रेफर करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे